भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे का?

दावा

भारताचे वन व्याप्त क्षेत्र गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढले आहे.

वस्तुस्थिती

दिशाभूल करणारा. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) मधील ‘फॉरेस्ट कव्हर’ (वन व्याप्त क्षेत्र) याची व्याख्या, नैसर्गिक वने आणि वृक्ष लागवड यामध्ये फरक करत नाही. यामुळे चहाचे मळे, नारळाचे मळे आणि अगदी वृक्षाच्छादित मार्ग देखील वने म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत.

ते काय म्हणतात

2021 च्या सरकारी आकडेवारीनुसार, 2019 ते 2021 दरम्यान भारताचे वन व्याप्त क्षेत्र सुमारे 1,540 चौरस किलोमीटरने वाढले आहे. 2021 मध्ये एकूण वन व्याप्त क्षेत्र भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.71% होते, जे 2019 मध्ये 21.67% इतके होते. पुढे, गेल्या दशकात एकूण क्षेत्रात सरासरी वाढ 21,762 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली.

आम्हाला काय आढळले

‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ म्हणून सार्वजनिक डोमेनमध्ये वन व्याप्त क्षेत्राची जी आकडेवारी समोर ठेवली गेली आहे, ती म्हणजे भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (FSI) चे द्विवार्षिक प्रकाशन आहे. 2021 च्या ताज्या अहवालानुसार, 2019 ते 2021 या कालावधीत भारताचे वन व्याप्त क्षेत्र सुमारे 1,540 चौरस किलोमीटरने वाढले आहे.

‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ नुसार, वन व्याप्त क्षेत्राची व्याख्या अशी केली आहे: “अशा सर्व जमिनी ज्यांचे क्षेत्रफळ 1 हेक्टरपेक्षा अधिक आहे, आणि मालकीचा आणि कायदेशीर दर्जाचा विचार न करता, ज्यांची वृक्ष आच्छादन घनता 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा जमिनी या नोंदणी केलेले वन क्षेत्र असल्या पाहिजेत अशी आवश्यकता नाही”     

2019 मध्ये, असे नोंदवले गेले होते की हवामान बदलावरील युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (UNFCCC) द्वारे केलेल्या भारताच्या वन व्याप्त क्षेत्राविषयीच्या सादरीकरणाच्या, तांत्रिक मुल्यांकनाने देशाच्या वनांच्या व्याख्येबद्दल चिंता व्यक्त केली होती, जे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वन व्याप्ती वाढवून सांगते  आणि हवामान लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्वनीकरण लपवते.

दरम्यानच्या काळात, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत सांगितले की, “वन व्याप्त क्षेत्र आणि अतिशय घनदाट वन” यांची व्याख्या बदलण्याची भारताची सध्या कोणतीही योजना नाही.

विभिन्नता 

व्याख्येनुसारच, हे स्पष्ट आहे की वन व्याप्त क्षेत्र अहवालात प्रजाती, पिकाची उत्पत्ती, जमिनीची मालकी आणि जमीन वापराचा आकृतिबंध या आधारावर कोणताही फरक केलेला नाही. कोणत्याही प्रकारचे हे जंगल मानले जाते, मग ते नैसर्गिक असो वा नसो. अहवालात, व्यावसायिक वृक्ष लागवड देखील वन क्षेत्र म्हणून नकाशीत केलेले आहेत. फळांच्या बागा या घनदाट आच्छादलेल्या जंगलासारख्या नसतात, त्यामुळे हा फरक महत्त्वाचा आहे. 

“वृक्ष लागवड, मग ते एका किंवा बहु-प्रजातीचे असले तरी त्याला वन किंवा वनासारखे म्हणून संबोधत नाही  नाही आणि संबोधले जाऊ शकत नाही. वनीकरण-वन्यजीव तज्ञ आणि माजी IFS अधिकारी असलेले मनोज मिश्रा म्हणाले, “दोन्हीही अतिशय भिन्न परिसंस्था आहेत ज्यांच्या हवामानाच्या प्रभावांच्या दृष्टीने भिन्न भूमिका आहेत.” ते यमुना जिये अभियानाचे निमंत्रक देखील आहेत. 

विविध वने ही विविध वृक्ष व्यापित आकृतीबंधासह विविध प्रकारची आहेत आणि त्यातील फरक न ओळखला जाणे हे दीर्घकाळासाठी उद्दिष्टाप्रत अडथळा आणणारे असू शकते.

“वन हे काही एकसंध अस्तित्व नाही किंवा भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रासाठी, जिथे देशाच्या विविध भागांतून किमान 16 व्यापक वन प्रकार ओळखले जातात, एकसमान संज्ञा नाही. या वन प्रकारांमध्ये भिन्न वृक्षाच्छादित आकृतिबंध आहेत जसे की एका टोकाला वृक्ष विरहित (थंड आणि उष्ण वाळवंट) पासून ते दुसऱ्या  टोकाला सदाहरित वृक्ष घनतेच्या (अंदमान आणि निकोबार बेटे) वनांपर्यंत”, असे मिश्रा पुढे म्हणाले.

वास्तविक संख्या

असे आढळून आले आहे की भारतातील वन व्याप्त क्षेत्रातील अल्प वाढ ही मुख्यतः खुल्या वनाखालील क्षेत्रात झालेली वाढ आहे आणि ही वाढ प्रामुख्याने व्यावसायिक वृक्ष लागवडीमुळे झालेली आहे. त्याच वेळी, मध्यम घनदाट वने किंवा मानवी वस्ती जवळील क्षेत्रे 2021 ते 2019 दरम्यान कमी झाली. एका दशकात (2021-2011), भारताचे मध्यम घनदाट जंगलाखालील 4.3% क्षेत्र कमी झाले.

,
सीएफसी इंडिया
सीएफसी इंडिया
Articles: 74